
Pune Tur News : देशातील तूर उत्पादन (Tur Production) यंदा घटलं. बाजारात आता हळूहळू तुरीची आवक (Tur Arrival) वाढत आहे. सध्या आवक कमी आणि मागणी जास्त असल्यानं दर तेजीत (Tur Rate) आहेत. पण दर कमी करण्यासाठी सरकारनं आयात वाढवली. त्यासाठी धोरणं आखली.
तसचं स्टाॅक केल्यास कारवाईचा इशाराही दिला. मात्र तरीही तुरीचे दर तेजीतच राहू शकतात. शेतकऱ्यांना तुरीसाठी सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशात यंदा तुरीचे उत्पादन घटले. सरकारनेही देशातील तूर उत्पादनाच्या अंदाजात जवळपास तीन लाख टनांची कपात केली. दुसऱ्या अंदाजात सरकारने देशातील तूर उत्पादन ३६ लाख टनांवर स्थिरावेल, असं म्हटलं.
तर मार्केटच्या मते, यंदा देशातील तूर उत्पादन ३० ते ३२ लाख टनांच्या दरम्यान राहील. तर चालू वर्षातील आयात ८ ते ८.५० लाख टनांच्या दरम्यान राहील. तर मागील हंगामातील शिल्लक साठा ६ ते ७ लाख टन असेल. म्हणजेच तुरीचा एकूण पुरवठा देशाची वार्षिक गरज कशीतरी भागवू शकतो.
देशातील बाजारात नवी तूर दाखल झाली. कर्नाटक, महाराष्ट्रातील बहुतेक बाजारांमध्ये आवक वाढत आहे. पण सध्याची आवक कमी आहे.
त्यामुळे तुरीचा भाव तेजीत आहे. यंदा सराकरनं तुरीसाठी ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.
देशात तुरीचे भाव तेजीत राहणार, असा अंदाज आल्यामुळं सरकारनं आयात वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शुल्काविना मुक्त आयातीला परवानगी दिली. आयात तूर खरेदीही केली. एवढं सगळं करूनही तुरीचा भाव तेजीतच आहे.
त्यामुळं देशात तुरीचा स्टाॅक केला जात असल्याचं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्राल्याचे सचिव रोहीत कुमार सिंह यांनी सांगितलं. इंडिया पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशन अर्थात आयपीजीएच्या पल्सेस काॅनक्लेव्हमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
काय म्हणाले खाद्यसचिव सिंह?
व्यापारी आणि उद्योगाला वाटते त्याप्रमाणात तुरीचं उत्पादन घटलं नाही, असंही सचिव रोहीत कुमार सिंह यांनी स्पष्ट केलं. तसचं स्टाॅकिस्ट, आयातदार आणि व्यापारी तुरीचा स्टाॅक करत असल्याची माहीती आहे.
त्यांनी हा स्टाॅक लवकर बाजारात आणावा, अन्यथा सरकार कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला. सरकार डाळींचे भाव कमी ठेवण्यात यशस्वी झालं. तुरीची आयात वाढवण्यासाठी सरकारनं दीर्घकालीन धोरणं आखली. त्यामुळं देशात तुरीचा पुरवठा वाढवता आला, असेही सिंह यांनी स्पष्ट केलं.
उत्पादन घटीमुळे शेतकरी अडचणीत
सिंह यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर आज तूर बाजारात याचे परिणाम दिसले. कमाल दरात क्विंटलमागं ५० रुपयांची नरमाई आल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. देशातील उत्पादन घटलं तरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला.
त्यामुळं हाती आलेल्या तुरीला किमान ८ हजार रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. पण भाव पाडण्यासाठी सरकारचा खटाटोप सुरु झाला.
दर तेजीतच राहणार
पण सरकारनं प्रयत्न केले तरी यंदा तुरीचे दर नियंत्रणात ठेवता येणार नाही, असं काही जाणकारांनी सांगतात. यंदा देशातील उत्पादन घटलं. आयातीतून गरजेएवढा पुरवठा वाढवता येणार नाही. त्यामुळं तुरीचे दर तेजीतच राहतील.
यंदाच्या हंगामात तुरीचा सरासरी भाव ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतो. तसचं देशातील तूर उत्पादनात जास्त घट दिसल्यास दर ९ हजारांचाही टप्पा गाठू शकतात.
पण दर ८ हजारांपेक्षा जास्त वाढल्यास सरकार बाजारावर नियंत्रण आणू शकते. त्यामुळं दरात जास्त वाढ होण्याची शक्यता कमी आहे, असेही तूर बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.