
अमरावती ः जिल्ह्यात पिकांची उत्पादकता (Crop Productivity) वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पीक स्पर्धा (Rabi Crop Competition) रब्बी हंगाम २०२२ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे पाटील यांनी केले आहे. पीकस्पर्धेत सहभागी होण्याची ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.
पीकस्पर्धेमध्ये रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान हजार हेक्टर असावे. तथापि, संबंधित पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग यासाठी सहभागी लाभार्थ्यांचे स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली भात पिकासाठी किमान २० आर व इतर पिकांसाठी ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबलामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे
योगदान मिळेल.
तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना
राबविण्यात येत आहे.
बक्षिसाचे स्वरूप राज्यस्तरावरील पीकस्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. तालुका पातळीसाठी पहिले बक्षीस रपये ५ हजार, दुसरे बक्षिस ३ हजार व तिसरे बक्षीस २ हजार असे स्वरूप आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षीस १० हजार, दुसरे बक्षीस ७ हजार व तिसरे बक्षीस ५ हजार असे स्वरूप आहे. तसेच राज्य पातळीसाठी पहिले बक्षीस ५० हजार, दुसरे बक्षीस ४० हजार व तिसरे बक्षीस ३० हजार असे स्वरूप आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम ३०० रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान १० व आदिवासी गटासाठी किमान ५ यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पीकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल. या पीकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे केले आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.