Kharip Sowing: राज्यभरात फक्त १३ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी

राज्याचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला.
Kharip Sowing
Kharip SowingAgrowon

राज्यात पावसाने (Rain) ओढ दिल्यामुळे पेरण्या (Sowing) रखडल्या आहेत. जून महिना (June) संपत आला तरी राज्याच्या अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यभरात फक्त १३ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरणीची स्थिती समाधानकारक नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गेल्या वर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी २७० मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र १३४ मिमी पाऊस झाला होता. गेल्या वर्षी या कालावधीत बहुतांश ठिकाणी पेरण्या उरकल्या होत्या. यंदा मात्र केवळ १३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा कमी झाला असून सध्या जेमतेम २१.८२ टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात ३३.८० टक्के, मराठवाडयात २७.१० टक्के, कोकणात ३४.४३ टक्के, नागपूर विभागात २६.८१ टक्के, नाशिक विभागात २०.०२ टक्के तर पुणे विभागात सर्वात कमी १२.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

राज्यात सध्या ६१० गावे आणि १२६६ वाडय़ांना ४९६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवडय़ाच्या तुलनेत टँकर्सची संख्येत ३१ने तर टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत २४ ने आणि वाडया-वस्त्यांच्या संख्येत १३० ने घट झालेली आहे, असे मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आले.

दरम्यान, राज्यात मका व सोयाबीन वगळता अन्य सर्व पिकांच्या पेरण्या दहा टक्क्यांच्या आत आहेत. सगळ्यात मोठा फटका कडधान्य पिकांना बसण्याची शक्यता आहे. कडधान्यांना गेले काही वर्षे भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आधीच पर्यायी पिकांकडे वळत आहेत. त्यातच पावसाने ओढ दिल्यानेही शेतकरी कडधान्यांचा पेरा कमी करण्याची शक्यता आहे.

गेल्या हंगामात सोयाबीनला विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात वाढवतील, असे मानले जात आहे. महाराष्ट्र हे सोयाबीन उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात आजघडीला सुमारे १८ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

Kharip Sowing
Soybean Cotton Seed rate मध्ये मोठी वाढ | Seed Price Hike | Agrowon | ॲग्रोवन

गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्के भरते. जुलैच्या मध्यापर्यंत सोयाबीनची लागवड केली तर चालू शकते, त्यामुळे आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास सोयाबीनचे क्षेत्र वाढेल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

राज्यात अनेक भागांत पाऊस नसल्याने पेरणी रखडली आहे तर यवतमाळ जिल्ह्यात मात्र पावसाचा खंड पडल्याने दीड लाख हेक्टरवरील पेरणी बाद झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचं आहे. पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com