
Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील बहुतांश भागात आकाशात ढगांची गर्दी वाढली असून काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह (Rabi Crop) फळ पिकांवर अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट घोंगावते आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजून पदरात पडली नसताना घोंगावणारे संकट शेतकऱ्यांची चिंता वाढवते आहे.
हवामान खात्याचा अंदाज १४ ते १६ मार्च दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा गारपट्टीचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे दोन दिवसापासून काढणीला आलेली पिकं काढून घेण्यासाठी शेत शिवारात लगबग वाढली आहे.
खास करून गहू हरभरा मका ज्वारी या रब्बी पिकांसह आंबा मोसंबी आदी फळ पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो. औरंगाबाद विभागात तीस ते चाळीस टक्के ज्वारी पिकाची काढणी व मळणी सुरू आहे.
पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या गव्हाची काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे. तर हरभरा पिकाची जवळपास ७० ते ८० टक्के काढणी व मळणीची कामे सुरू आहेत.
अशा अवस्थेत घोंगावणारे अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांची चिंता वाढवते आहे. काढणी झालेल्या रब्बी ज्वारीचा कडबा जमा करण्याचे कामही शेतकरी करीत आहेत.
काही ठिकाणी पावसाची हजेरी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी (ता. १५) सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आदी जिल्ह्यात काही भागात आकाशात ढगांची गर्दी झाली होती.
जालना जिल्ह्यातील केदारखेडा व हसनाबाद परिसरात सकाळी पावसाचा अधून मधून शिडकावा पडत होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबेजळगाव शिवारात सकाळी आठ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी झाल्या.
तर बालानगर परिसरात रिमझिम पाऊस झाला. पळशी, शेंद्रा वरुड, सावंगी आधी शिवारातही पावसाचा जोरदार शिडकावा झाला. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व दूर आकाशात ढगांची गर्दी कायम होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.