
Ratnagiri Mango Crop News : दरवर्षी मार्च ते एप्रिल या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा प्रभाव तयार होतो; मात्र यंदा त्या लवकर जाणवत आहेत. त्याचा परिणाम हापूसवर (Hapus Mango) होत आहे.
बदलत्या वातावरणानुसार (Change Weather) बागायतदारांनी प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. वैभव शिंदे यांनी सांगितले.
मुंबईत मुख्यमंत्री निवासस्थानी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आंबा उत्पादक संघाने केलेल्या मागणीनुसार रत्नागिरी येथे गुरुवारी (ता. २३) झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
वाढते तापमान, फुलकिडी, फळमाशी आणि तुडतुडा याचा आंबा लागवडीवर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यावर डॉ. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, बावा साळवी यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, की जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून त्याचा हापूसवर परिणाम होत आहे. फळगळ टाळण्यासाठी फळांना पेपर बॅग लावणे, झाडांना वेळीच गरजेनुसार पाणी देणे व बुध्यांत मल्चिंग करणे असे प्रभावी उपाय केले पाहिजेत.
तापमान किती आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी बागेत थर्मामीटर बसवावा. तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेले की त्यावर उपाय कराव्यात. नोव्हेंबर, डिसेंबरला येणाऱ्या मोहोरातून उत्पादन मिळण्यासाठी १२० ते १३० दिवस लागतो;
त्यानंतर येणाऱ्या मोहरातून ६५ दिवसांत फळ तयार होते. यावर्षी बदलत्या वातावरणामुळे कार्बोहायड्रेट तयार होण्याचा कालावधीच कमी राहिला. परिणामी आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात १५ टक्केच मोहर आला. तर पुढील टप्प्यात ३५ टक्के प्रमाण आहे.
सध्या मोहराचे सेटिंग व्यवस्थित होईल. परंतु उष्मा लवकर जाणवू लागल्याने भविष्यात पारा दोन अंश अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळगळीची शक्यता आहे. त्यासाठी बागायतदारांनी आतापासूनच सज्ज रहावे.
आंब्यावरील किडींच्या प्रादुर्भावावर माहिती देताना डॉ. शिंदे म्हणाले, की फुलकीडाचा प्रादुर्भाव समुद्रकिनारी बागांमध्ये दिसतो. फळ चिकूच्या आकारासारखे होते. यावर नियंत्रणासाठीची औषधे महाग आहेत. त्यामुळे बागायतदारांनी गरजेनुसार औषधे वापरावीत.
झाडावरील फवारणीबरोबर जमिनीत कीटकनाशके टाकल्यास अधिक प्रभाव पडतो. फळमाशी आणि तुडतुडा नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकानुसार नियोजन केले करावे.
वानवरांवर उपाय सूचवा ः गोरिवले
वानरांच्या उपद्रव टाळण्यासाठी येत्या दोन दिवसांत विशेष नियोजन करण्यासाठी अभ्यास सुरू असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. याबाबत हरिश्चंद्र गोरीवले यांनी प्रश्न उपस्थित केला.
शंभर ते दीडशे वानरांची टोळी बागेत शिरते आणि सगळेच नेस्तनाबूत करते. आमच्यासारख्या छोट्या बागायतदारांपुढे व्यावसाय बंद करायची वेळ आली आहे. यावर उपाय सुचवा, असे गोरिवले म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.