
Wheat Update : केंद्र सरकारने २०२२-२३ च्या हंगामातील पीक उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. या अंदाज गेल्यावर्षीपेक्षा अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया आणि कापूस उत्पादन वाढल्याचे सरकारने म्हटले आहे.
विशेष म्हणजे उद्योगांचे अंदाज कमी असताना सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादनाचे अंदाज वाढवले आहेत
देशातील रब्बी हंगामाला यंदा फेब्रुवारी आणि मर्चा महिन्यात पाऊस आणि वादळाने तडाखा दिला. पण असे असतानाही देशातील अन्नधान्य उत्पादनात दुसऱ्या अंदाजच्या तुलनेत तिसऱ्या अंदाजात २.१ टक्क्याची वाढ करण्यात आली.
केंद्रीय कृषी विभागाने यंदा देशातील अन्नधान्य उत्पादन ३ हजार ३५३ लाख टनांवर पोचल्याचे सांगितले. दुसऱ्या अंदाजापेक्षा सरकारने जवळपास दीड हजार टनांची वाढ केली आहे.
सरकारच्या मते देशात यंदा गहू उत्पादनात वाढ होऊन १ हजार १२७ लाख टनांवर पोचले. गेल्या हंगामातील गव्हाचे उत्पादन १ हजार ७७ लाख टनांवर स्थिरावले होते. सरकारनेय यंदा देशातील गहू उत्पादनात वाढ दाखवली तरी, उद्योगांच्या मते देशातील गहू उत्पादन यंदा १ हजार ५० लाख टनांवरच स्थिरावेल.
व्यापारीही यंदा गहू उत्पादन कमीच असल्याचे सांगत आहेत. सरकरला यंदाही गहू खरेदीचे उद्दीष्ट गाठता आले नाही. याचाच अर्थ देशातील उत्पादन यंदाही कमी आहे, असे व्यापारी सांगत आहेत. २४ मे पर्यंत सरकरला २६१ लाख टन गव्हाची खरेदी करता आली. तर यंदा खरेदीचे उद्दीष्ट ३४५ लाख टन होते.
तांदळाचे विक्रमी उत्पादन
सरकारने खरिपातील तांदूळ उत्पादनाच्या अंदाजातही वाढ केली. सरकारच्या मते यंदा देशात १ हजार १०० लाख टन तांदूळ उत्पादन होईल. गेल्या हंगामातील उत्पादन १ हजार ११० लाख टन होते. तर देशातील सर्व हंगामातील तांदूळ उत्पादन विक्रमी पातळीवर पोचेल. यंदा देशात १ हजार ३५५ लाख टन तांदूळ उत्पादन होईल, असाही अंदाज सराकने व्यक्त केला
मका उत्पादन वाढले
रब्बी हंगामातील मका आता बाजारात येत आहे. बाजारात आवकेचा दबाव आणि निर्यातीसाठी कमी मागणी असल्याने मक्याचे भाव दबावात आहेत. आता सराकरने देशातील मका उत्पादनाच्या अंदाजात वाढ केली आहे. सरकारच्या मते यंदा देशात ३४६ लाख टन मका उत्पादन झाले. गेल्यावर्षी मका उत्पादनाने ३३७ लाख टनांवर नांगी टाकली होती.
भरडधान्यांमध्ये चांगली वाढ
सरकारने यंदा भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे यंदा देशात बाजारी, ज्वारी, बार्ली आणि लहान भरडधान्याचे उत्पादन वाढले. गेल्या हंगामात देशात केवळ ५११ लाख टन भरडधान्य उत्पादन झाले होते. ते यंदा ५४७ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला.
कडधान्याचा अंदाज कमी
देशातील कडधान्य उत्पादनाच्या अंदाजात कपात केली. सरकारने यंदा देशात २७५ लाख टन कडधान्य उत्पादन झाल्याचे सांगितले. दुसरा अंदाज २७८ लाख टनांचा होता. तर गेल्या हंगामातील कडधान्य उत्पादन २७३ लाख टन झाले होते. देशात गेल्या हंगामात तुरीचे ४२ लाख टन उत्पादन झाले होते. ते यंदा ३४ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे.
तर हरभऱ्या उत्पादन गेल्यावर्षीऐढेच म्हणजेच १३५ लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त केला. उडदाचे उत्पादन २८ लाख टनांवरून २६ लाख टनांवर स्थिरावेल, असेही सरकारने म्हटले आहे.
तेलबिया उत्पादनात वाढ
सरकारने यंदा देशातील सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात मोठी वाढ केली आहे. गेल्यावर्षी देशातील सोयाबीन उत्पादन १२० लाख टन झाले होते. ते यंदा जवळपास १५० लाख टनांवर पोचल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला.
तर एकूण नऊ तेलबिया उत्पादन ४९० लाख टनांवर पोचल्याचे सरकारने म्हटले आहे. मोहरीचे उत्पादन गेल्यावर्षीच्या १२० लाख टनांवरून यंदा १२५ लाख टनांवर पोचल्याचा अंदाजही सरकारने व्यक्त केला.
कापूस उत्पादन अंदाजात वाढ
एकिकडे कापूस उद्योग देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करत असताना सरकारने मात्र उत्पादन जास्त झाल्याचे म्हटले आहे. सरकारने दुसऱ्या अंदाजात ३३७ लाख गाठी उत्पादन झाल्याचे म्हटले होते. पण तिसऱ्या अंदाजात उत्पादन ३४३ लाख गाठींवर पोचल्याचा अंदाज व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.