Team Agrowon
‘‘राष्ट्रीय आपत्ती निवारणच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार ‘लम्पी स्कीन’मुळे (Lumpy Skin) बाधित जनावरांच्या मृत्यूनंतर मदत (Animal Insurance) देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.
त्यानंतरही जनावरांची किंमत आणि शासनाकडून देण्यात येणारी मदत तोकडी असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यात वाढ करता येणार नाही.
त्यामुळे पशुपालकांना संरक्षण देण्यासाठी येत्या काळात सक्षम अशी राज्याची विमा योजना आणण्याचे प्रस्तावित आहे,’’ अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत मंगळवारी (ता. २७) विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.
मोहिते-पाटील यांनी लम्पी स्कीनबाधित जनावरांचा मुद्दा मांडला होता.
लाखो रुपयांचे जनावर दगावल्यानंतर शासनाकडून मदत म्हणून तोकडी रक्कम दिली जाते. त्यात वाढ करावी.
राज्यातील अनेक पशुपालकांना अद्याप मदत मिळाली नाही. ती कधी मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यात २८ हजार जनावरे दगावली आहेत.