
Cotton Rate Update : कापूस बाजारात आता तेजीची चाहूल दिसते. अनेकांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांनी जवळपास ८० टक्के कापूस विकला. शेतकऱ्यांकडं केवळ २० टक्के कापूस शिल्लक आहे. यापैकी काही कापूस पुढील एक, दोन आठवड्यात बाजारात येईल.
सध्या बाजारातील कापूस आवक (Cotton Arrival) घटली तरी सरासरीपेक्षा जास्त आहे. दरातही क्विंटलमागं ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाली. पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील आवक कमी होऊन दरातील तेजी वाढले, असा अंदाज कापूस बाजार विश्लेषक, व्यापारी आणि उद्योगांकडूनही व्यक्त केला जातोय.
आपल्याला एक अनुभव बाजारात नेहमी येतो, तो म्हणजे शेतकऱ्यांकडं कापूस असतो तेव्हा बाजारात वेगवेगळ्या चर्चा असतात. कापसाचा भाव ६ हजार असला काय आणि ८ हजार असला काय सर्वच पातळ्यांवर तोटा होत असल्याचं सांगितलं जातं.
पण शेतकऱ्यांचा माल बाजारात येऊन गेल्यावर सगळे फायद्यात येतात आणि कापूस दर वाढतात. हा अनुभव तुम्हीही प्रत्यक हंगामात घेतच असाल. कापूस उत्पादकांना हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही.
दरवर्षी काही शेतकरी दरवाढीपर्यंत थांबतात. त्यांना फायदाही होतो. पण या शेतकऱ्यांची संख्या एक टक्काही नाही. ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागतो. यासाठी आपण शेतकऱ्यांना पूर्ण दोष देऊ शकत नाही. त्यासाठी अनेक कारण असतात.
त्यात बाजाराची अपुरी माहिती, मागणी आणि पुरवठ्याचं गणित, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, कृत्रिम म्हणजेच व्यापारी किंवा उद्योगांनी आणलेली तेजी-मंदी, साठवणुकीतील अडचणी भविष्यातील बाजारभावाचा अंदाज बांधता येत नाही असे अनेक कारण सांगता येतील.
त्यामुळं बाजारातील अफवांना शेतकरी बळी पडतात. परिणामी हंगामातील तेजीचा फायदा शेतकऱ्यांना कमीच होतो.
देशातील कापूस बाजार आता तेजीकडं वाटचाल करताना दिसतोय. या तेजीचा फायदा कमी शेतकऱ्यांना होईल, हेही स्पष्ट होतंय. कारण बहुतांशी शेतकऱ्यांनी कापूस फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच विकला.
या दोन महिन्यांमधील कापसाचा सरासरी भाव ७ हजार ८०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान होता. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस बाजाराची स्थिती पाहता यंदाही चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज होता.
अनेक जाणकार आणि संस्था शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळून, बाजाराचा आढावा घेऊन विक्री केल्यास किमान ८५०० रुपये भाव मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त करत होते.
यंदा देशात कापसाचा पुरवठा कमी दिसत होता. उद्योगांनी म्हटल्याप्रमाणं यंदा देशातील उत्पादन होणार नव्हतं. पण शेतकऱ्यांचा पहिल्या चार ते पाच महिन्यांमध्येच बाजार येईल, असा आजवरचा अनुभव आहे. मागील हंगामातही मार्चपर्यंतच जवळपास ९० टक्के कापूस बाजारात आला होता.
त्यानंतर कापूस दरात आलेल्या तेजीचा हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांनाच फायदा झाला. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना सरासरी ८ हजारांच्या दरम्यान भाव मिळाला. यंदा शेतकऱ्यांनी लगेच विक्री केली नाही आणि दरवाढीची वाट पाहिली तर चांगला भाव मिळू शकतो, असा अंदाजही वर्तविण्यात आला होता. त्यामुळंच शेतकऱ्यांनी थांबवं असंही सांगितलं जात होतं.
सध्या देशातील शेतकऱ्यांकडं कमी कापूस शिल्लक आहे. अनेक उद्योगांना कापसाचा तुटवडाही जाणवतोय. त्यामुळं उद्योगांना खरेदी वाढवावी लागणार आहे. पण शेतकऱ्यांनी अजूनही पॅनिक सेलिंग टाळल्यास दरात चांगली सुधारणा होऊ शकते.
मागील दोन दिवसांमध्ये कापूस दरात वाढ झाली. कापसाची सरासरी दरपातळी आत ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचली. पण ही सरासरी दरपातळी आहे. किमान किंवा कमाल नाही. किमान दर यापेक्षा कमी असू शकतात. तर कमाल दर जास्त.
अनेक बाजारांमध्ये सरासरी किमान भाव ७ हजार ७०० रुपयांपर्यंत पोचला. तर कमाल भावानं काही बाजारांमध्ये ८ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठला.
कापूस कशी आहे?
कमाल दर अगदी कमी बाजारांमध्ये आणि कमी मालाला मिळाला. या मालाची गुणवत्ता चांगली असते. कापूस लांब धाग्याचा असतो. त्यामुळं सहाजिकच दरही जास्त मिळतो. तरीही सरासरी दरपातळी आता वाढली. बाजारातील कापूस आवक मार्चच्या तुलनेत कमी झाली.
पण एरवी एप्रिल महिन्यात बाजारात येणाऱ्या मालाच्या तुलनेत जास्त आहे. याचा काहीसा परिणाम दरवाढीवर होतोय. पुढील आठवडाभर आवक सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. त्यानंतर मात्र आवकेचा दबाव कमी होईल, असा अंदाज व्यापारी आणि उद्योगांकडूनही व्यक्त करण्यात आला.
कमी कापूस उपलब्ध
आता देशातील शेतकऱ्यांकडे केवळ ८० ते ८५ लाख गाठींच्या दरम्यान कापूस असू शकतो. त्यामुळं एप्रिलनंतर कापसाची आवक एकदम कमी होईल. शेतकऱ्यांकचा कापूस संपला की स्टाॅकिस्ट आणि व्यापारी यांचा माल बाजारात येईल. त्यांच्याकडेही यंदा कमी स्टाॅक असल्याचं सांगितलं जातं. पण शेतकऱ्यांचा माल कमी झाल्यानंतर बाजारात नफेखोरी सुरु होईल, याला उद्योगांकडूनही दुजोरा दिला जातोय.
शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा?
पुढील काळात कापूस दरावर दबाव टाकणारे फंडामेंटल्स दिसत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दर टिकून आहेत. जागतिक पातळीवर मंदी असली तरी कापसाचाही पुरठा जास्त नाही. देशातील उद्योगांकडून कापसाची खरेदी सुरुच आहे.
तसेच उद्योग आता फायद्यात काम करत आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून उठाव येईल. पुरवठा कमी असल्यानं दरातील तेजी वाढेल. शेतकऱ्यांनी शक्य असल्यास तेजीचा लाभ घ्यावा. पण अचानक बदललेल्या परिस्थितीचा बाजारावर परिणाम होत असतो, हेही लक्षात ठेवावं.
जसं की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आवक वाढल्यानं दर कमी झाले होते. त्यामुळं बाजाराकडं लक्ष असू द्यावं. केवळ ऐकिव माहितीवर निर्णय न घेता बाजाराचा आढाव घेऊनच विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.