
१) कापूस दर दबावातच (Cotton Rate)
कापूस बाजारात सध्या नरमाई दिसत आहे. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावातच आहेत. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ७८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील कापसाची सरासरी दरपातळी प्रति क्विंटल ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपयांच्या दरम्यान राहिली.
बाजारातील आवक वाढल्यामुळे कापूस दर दबावात आहेत. एप्रिल मध्यानंतर कापूस आवक कमी होऊ शकते. त्यामुळं दरात सुधारणाही दिसेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) सोयाबीनमध्ये नरमाई (Soybean Rate)
गेल्या वर्षीशी तुलना केली तर देशातील शेतकऱ्यांनी यंदा हंगामातील पहिल्या पाच महिन्यांमध्ये सोयाबीनची विक्री जास्त केली. तसेच मार्च महिन्यातील आवक सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर दबावात आहेत.
सध्या सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरु आहेत.
पुढील काळात सोयाबीन आवक कमी झाल्यानंतर देशातील बाजारांत दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
३) आल्याचे भाव कमीच
बाजारात सध्या आल्याचे दर दबावात आहेत. बाजारातील आल्याची आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. पण दुसरीकडे उठाव नाही. त्यामुळे आवक घटूनही आल्याचे दर दबावात आहेत. सध्या आल्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.
आल्याचे उत्पादन वाढल्याचा परिणाम दरावर होत आहे. आल्याच्या दरातील नरमाी पुढील काही दिवस कायम राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
४) केळीचे दर तेजीत
सध्या केळीचे दर तेजीत आहेत. रमजान तोंडावर आल्याने केळीला चांगला उठावही मिळतोय. यंदा केळीच्या उत्पादनाला बदलते वातावरण आणि पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सध्या केळीला प्रतिक्विंटल २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तसेच यंदा उत्पादनात मोठी घट असल्याने पुढील काळात केळीचे दर चांगले राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
५) तुरीचे भाव काय राहू शकतील?
बाजारात सध्या व्यापाऱ्यांना पुरेशी तूर मिळत नाही. एरवी या दिवसांत व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध असते. पण सध्या महाराष्ट्रातील महत्वाच्या लातूर, सोलापूर, जालना आणि अकोला तसेच कर्नाटकातील प्रमुख बाजारांतही तुरीची आवक खूपच कमी आहे.
व्यापाऱ्यांना कमी तूर मिळत असल्याने तूर डाळीचे दरही वाढत आहेत. सध्या महाराष्ट्रात ११५ ते १२० रुपये किलोने तूर डाळ मिळत आहे. तर इतर राज्यांतील दरपातळी १२० ते १३० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे तुरीलाही आधार मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदा देशातील तूर उत्पादन घटले. मागील हंगामात हमीभावापेक्षा कमी दर मिळल्याने शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली. त्यातच पावसामुळे उत्पादनात घट आली. त्यामुळे यंदा तूर मिळत नसल्याचं व्यापारी आणि उद्योगाचे प्रतिनिधी सांगत आहेत.
त्यामुळे बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर सरासरी ८ हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत. सध्या देशात तुरीला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये भाव मिळतोय. तूर उत्पादनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये महत्त्वाची आहेत.
तिथे तुरीचे भाव जास्त असल्याने इतर राज्यांतील बाजारांतही तुरीला आधार मिळतोय. यंदा देशात तुरीची उपलब्धताच कमी असल्याने दरपातळी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. सरकार तूर डाळीचे भाव १३० रुपयांपेक्षा जास्त झाल्यास बाजारात हस्तक्षेप करू शकते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.